पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागच्या महिन्यात शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा घोषित केला असून त्याचा परिणाम आता शिवभोजन योजनेवर होत आहे. राज्य सरकारच्या पाच दिवसांच्या आठवड्यामुळे शनिवार-रविवार असे दोन दिवस शासकीय कार्यालये बंद राहत आहेत. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरातील या योजनेच्या केंद्रातील थाळ्या दोन दिवस शिल्लक राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील शिवभोजन योजनेवर याचा परिणाम होताना दिसत आहे.
तसेच याबद्दल पुरवठा विभागाकडे तक्रार आली असून थाळ्यांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. पाच आठवड्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला एकच आठवडा उलटला असून अनेक केंद्र चालकांकडून थाळ्या शिल्लक राहत असल्याची तक्रारी आल्या आहे. त्यासाठी केंद्रावरच्या थाळ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
पुण्यात शिवभोजन योजना २६ जानेवारीपासून सुरु झाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ११ शिवभोजन केंद्र सुरु केली आहेत. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या ठिकाणहुन थाळ्या शिल्लक राहत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दुसरीकडे स्वारगेट, मार्केटयार्ड या ठिकाणी थाळ्यांची संख्या वाढवण्याबाबत सूचना मिळाल्या आहेत. सातही दिवस आणि शासकीय सुट्टीच्या दिवशीही शिवभोजन केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा आणि येणाऱ्या शासकीय सुट्ट्या लक्षात घेऊन शासकीय इमारतींच्या परिसरातील थाळ्यांची संख्या कमी करून स्वारगेट, मार्केटयार्ड येथील केंद्रांच्या थाळ्यांची संख्या वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.