नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यातील राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना भाजपची साथ सोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. दरम्यान, या भेटीचा उद्देश राज्यातील राजकारण नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार प्रथम पंतप्रधानांना भेटतील आणि त्यानंतर राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पवारांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटणार आहे.
शिवसेना बोलली – पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानानां कोणता नेता भेटला तर त्यांच्यात फक्त खिचडीच शिजते का ?” पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणींचा सामना करीत आहेत. पवार आणि उद्धव साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करतात. पवार साहेब हे शेती क्षेत्रातील एक नामांकित चेहरा आहेत. महाराष्ट्रातील शेतीविषयक समस्यांविषयी त्यांना चांगले ज्ञान आहे.
पंतप्रधानांकडून राष्ट्रवादीचे कौतुक :
महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस आधी राज्यसभेत राष्ट्रवादी आणि बीजेडीचे कौतुक केले होते. पंतप्रधान म्हणाले, हे दोन्ही पक्ष असे आहेत, ज्यांनी कधीही संसदीय नियम मोडले नाहीत. आज मला या दोन्ही पक्षांचे कौतुक करावेसे वाटते. भाजपसोबतच इतर पक्षातील खासदारांनी या दोन्ही पक्षांकडून शिकले पाहिजे. पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही पक्ष कधीही वेलमध्ये उतरले नाहीत, परंतु या दोघांनीही आपले मुद्दे ठामपणे मांडले आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या सरकारमध्ये पाचही वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल. इतर मंत्रीपदे या तीन पक्षांमध्ये विभागली जातील. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित असल्याचे कुठल्याही स्तरावर दिसून येत नाही.
Visit : bahujannama.com