मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मी 50 वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेने दिली म्हणून इथपर्यंत येता आले, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Nationalist Congress Party Chief, Sharad Pawar) यांनी आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आपण जी विचारधारा स्वीकारली. जे सूत्र स्वीकारले त्या मार्गाने जाण्याचे काम करायच असते. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथ तुम्हाला समजते. पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केले पाहिजे हे त्या मातेने स्वीकारल आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागले, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
मुंबईत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडिया उभारण्यात आले. ते जेव्हा भारतात आले, तेव्हा त्या गेटजवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी स्वतः उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. त्यांच्या हातात पत्र होते. त्यात संकरित वाण तयार करण्याची मागणी होती. दुसरी मागणी दुग्धव्यवसायासंदर्भातील होती. संकरित गाई निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्योतिबांना आपण महात्मा मानतो की, त्यांनी विज्ञानाचा आधार घेतला, असे पवार म्हणाले.
तसेच आज या देशाला भक्कम व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिले. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याचे खाते होते. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, पवार म्हणाले.