बीजिंग : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे केंद्र असलेल्या चीनच्या वुहानमध्ये सध्या प्रचंड भितीचे वातावरण आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक विविध प्रकारची काळजी घेत आहेत. तर याठिकाणी अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर बाहेर काढण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारतानेही आपल्या 323 नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने मायदेशात आणले आहे. आता जास्त आजारी असलेले 6 भारतीय विद्यार्थी चीनमध्ये आहेत. अशाप्रकारे सर्व देश आपल्या नागरिकांसाठी प्रयत्न करत असताना पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांना परत न आणण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी संतापले आहेत.
वुहानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत न आणण्याचा निर्णय पाकिस्तानच्या इमरान खान सरकारने घेतला असून सरकारने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याच्या भावनेमुळे या विद्यार्थ्यांना खूप दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतून पाकच्या विद्यार्थ्यांचे हे दु:ख दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसमध्ये बसत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत एक विद्याथी म्हणतो, हे भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांना घेऊन जाण्यासाठी दूतावासांनी बस पाठवली आहे. वुहान विद्यापीठातून ही बस एयरपोर्टला नेण्यात येईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले जाईल. बांगलादेश सरकारकडूनही विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बस येणार आहे. पाक पत्रकार नायला इनायतने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तुम्हाला लाज वाटायला हवी
संतापलेल्या एक पाकिस्तानी विद्यार्थी म्हणाला, आम्ही असे विद्यार्थी आहोत ज्यांचे सरकार म्हणजे तुम्ही जिवंत रहा की मरा. संक्रमण होत असेल तर होऊदे. तुम्हाला कोणतीही सुविधा देणार नाही आणि स्वदेशीही घेऊन जाणार नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी पाक सरकार. भारताकडून काहीतरी शिका. ते कशा पद्धतीने आपल्या नागरिकांना साहाय्य करीत आहेत.