इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारतासह जगातील अनेक देश कोरोना वायरसचे केंद्र असलेल्या चीनमधील वुहान शहरात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. चीनमध्ये उग्र रूप धारण केलेल्या या वायरसमुळे आतापर्यंत 259 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 12,000 लोकांना कोरोना वायरसचा संसर्ग झाला आहे. जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना येथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असताना पाकिस्तान सरकारने आपल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
वुहानमध्ये सध्या शेकडो पाकिस्तानी विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांची रडून-रडून बिकट आवस्था झाली आहे. पाकिस्तानी विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे पाक सरकारला सतत विनंत्या करून पाकिस्तानात घेऊन जाण्यास सांगत आहेत. परंतु, पाकिस्तानी सरकारने त्यांना मरण्यासाठीच येथे सोडल्याचे दिसत आहे. हे विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत की, भारताने ज्याप्रकारे आपल्या विद्यार्थ्यांचे रक्षण केले आणि त्यांना येथून बाहेर काढले त्याप्रमाणेच पाक सरकारनेही आमचे रक्षण करावे.
पाकिस्तानच्या सरकारला या मुद्द्यावरून देशांतर्गत टीकेलाही तोंड द्यावे लागत आहे. विरोधी पक्षांनी जोरदार टीका केल्यानंतरही पाक सरकारने वायरस पीडित चीनमध्ये अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना न आणण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले आहे. आरोग्यसंबंधी पीएम इम्रान खान यांचे विशेष सहायक डॉ. जफर मिर्जा यांनी शनिवारी यास दुजोरा दिला.
डॉ. जफर मिर्जा म्हणाले, आता हा वायरस माणसाकडून माणसाकडे पसरत आहे. याचा अर्थ वायरसचा संसर्ग झालेली व्यक्तीसुद्धा या वायरसचा स्त्रोत बनू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक आपत्ती जाहीर केले आहे. एक जबाबदार राष्ट्र या नात्याने पाकिस्तान असे पाऊल उचल आहे. जे सर्वाधिक लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य आहे. आमचे म्हणणे आहे की, आता चीनमध्ये आमच्या नागरिकांनी राहणे आमच्या नागरिकांच्या हिताचे आहे. यासाठी मोठ्या विचारपूर्वक तेथील नागरिकांना बाहेर न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यावरून हे दिसते की, पाकिस्तान या वायरसमुळे खुप घाबरलेला आहे. कारण पाकिस्तानकडे मोठ्या प्रमाणात उपचार व्यवस्था नाही. ते आपल्या नागरिकांवर देशात उपचार करू शकत नाहीत. पाकिस्तानमध्ये एक जरी रूग्ण सापडला तरी वायरस वेगाने पसरण्यास वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे.