बहुजननामा ऑनलाईन टीम : महाविकासआघाडीच्या सत्ता स्थापनेवर अंतिम शिक्का मोर्तब होत असताना अजित पवारांनी रात्रीतून भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी शरद पवारांना कोणतीही कल्पना न देता स्वतः हा निर्णय घेतला. त्यावर आता स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांना भूतकाळाच्या घटनेची आठवण करून दिली आई. पाठीत खंजिर खुपसणं म्हणजे काय हे शरद पवारांना आज कळालं असेल, असा चिमटा शालिनीताई यांनी पवारांना लगावला. दरम्यान, शालिनीताई ह्या शरद पवारांच्या कट्टर दुश्मन मानल्या जातात, त्यांमुळे ४० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करत शालिनीताई यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
वास्तविक, १९७८ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागले. या निवडणुक निकालात जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या. दुसरीकडं इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. तर शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९, आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळीही स्पष्ट बहुमत कुणालाही नव्हतं. मात्र, जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. जनता पक्षाला रोखण्यासाठी इंदिरा कांग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांनी आघाडी केली आणि मार्च १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नासिकराव तिरपुडे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यावेळी शरद पवार अचानक ४० आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले, त्यामुळे अल्पमतात आलेल्या वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. केवळ ४० आमदारांचं संख्याबळ असताना ‘पुलोद’च्या माध्यमातून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर शरद पवारांवर त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला, असा आरोप करण्यात आला.
Visit : bahujannama.com