पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोना व्हायरसचा परिणाम होत असून केंद्र सरकार याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. तसेच अनके कठोर निर्णयही घेत आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे पुणे, मुंबईसह राज्यात संचारबंदी केली आहे. या व्हायरसने देशाची आर्थिक परिस्थितीही खालावत असून धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुण्यातील सीरत कमिटीने मशिदी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. महत्वाचा म्हणजे शुक्रवारी घरीच नमाज पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी सूचना दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असून राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. या दरम्यान मात्र मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टने वेगळाच निर्णय घेतला असून ते दर्गा बंद ठेवणार नाहीत. पण दर्ग्यात येणाऱ्या भाविकांसाठी बंधने घालण्यात आली आहेत, अशी माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे.
प्रत्येक एक तासानंतर दर्गा साफ करण्यात येणार असून दर्गा भाविकांसाठी दिवसभरात केवळ ४ ते ५ तास खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच नमाज पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असे आवाहनही ट्रस्टने केले आहे. ताहेर यांनी सांगितले की, हाजी अली दर्ग्यावर दररोज ५० हजारांपेक्षा जास्त भाविक येतात. त्यांच्यासाठी दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे.