राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या 12 उमेदवारांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. 12 आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. राज्य सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, अशा शब्दात राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. तसेच केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे अशी मागणी राऊत यांनी केली.
दरम्यान, राज्यपाल कोट्यातून भारवयाच्या विधान परिषदेतील 12 जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूनं विचार करुन आणि नियम-अटींचे पालन करुन सरकारनं ही नावं पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करुन दोन महिने उलटल्यानंतरही राज्यापालांनी यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (शुक्रवारी) दिला होता. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करत राज्यपालांवर टीका करुन त्यांना परत बोलवण्याची मागणी केंद्राकडे केली.