मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपालांवर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांविरोधात केलेली टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं ? अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्ती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. याच मुद्यावरुन संजय राऊत यांनी म्हटले की, राजभवनात कोणतं भूत आहे ? विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या ? अशी टीका केली होती. त्यासंदर्भात फडणवीस यांना विचारण्यात आले असता राजभवनातील विधानपरिषदेच्या आमदारांच्या यादी संदर्भात राजभवन उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. मात्र, भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं आहे. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करु नये. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असंत, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्यपालनियुक्त सदस्यांच्या मुद्यावरुन संजय राऊत यांनी सामनातून टीका केली होती. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळवली. राजभवनात अलिकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे ? एकदा शांतीयज्ञ करुन घ्यावा लागेल ! असा खोचक सल्ला त्यांनी सामनातून देण्यात आला आहे.