पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वारज्यात सराईत गुन्हेगारांनी भलताच राडा घालत चक्क कुटुंबालाच मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर गल्लीत कोयते व लोखंडी सळई हवेत फिरवून तुफान दहशत माजवली आहे. त्यामुळे रहिवाशी घाबरून गेलेच पण रिक्षा चालकांनी पळ काढला अन रहिवाशांनी घर लावून घेतली. हे सगळं रात्री साडे नऊ वाजता घडले आहे. अद्याप तरी यात कोणाला पकडले गेलेले नाही.
याप्रकरणी किरण पवार (वय 24, रा. लक्ष्मीचौक, रामनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पवार आणि या आरोपींची जुनी भांडण आहेत. यातील तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यावरून हा वाद झाला आहे, असे उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी सांगितले आहे.
नेमकं रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हे चौघेजण हातात कोयते अन लोखंडी सळई हातात घेऊन परिसरात गोंधळ घालत आले. तुफान आरडाओरडा अन शिवीगाळ करत त्यांनी फिर्यादी यांच्या घरासमोरच ठिय्या घातला आणि तुम्ही आमच्याशी वाद घालत काय म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी यांच्या आजीला, काका आणि भाऊ यांना मारहाण करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना मारहाण होत असल्याने परिसरातील नागरिक सोडवण्यास गेले असता त्यांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातला. त्यामुळे लोक व रिक्षा चालक येथून पसार झाले, असे पोलिसांच्या फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवदास गायकवाड हे करत आहेत.