सांगली बहुजननामा ऑनलाईन – पुरात अडकलेल्या नागरिकांना काढत असताना बोलट उलटल्याची घटना पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे आज घडली. या घटनेत १४ जणांना जलसमाधी मिळाली तर १६ जण बेपत्ता आहेत. ३२ नागरिकांना बाहेर काढताना ही बोट उलटली.
मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे –
कल्पना रवींद्र कारंडे, कस्तुरी बाळासो वडेर, पप्पू ताई भाऊसो पाटील, लक्ष्मी जयपाल वडेर, राजमाती जयपाल चौगुले, बाबासो अण्णासो पाटील, अनोळखी इसम, मयत एक लहान मुल
ब्रम्हनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आल्याने ब्रम्हनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ दिसत आहे. संपुर्ण ब्रम्हनाळ गावाला नदीच्या महापूराच्या पाण्याने वेढले आहे. गावात तीन दिवसांपासून पाणी भरले आहे. गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. गुरुवारी सकाळी नागरिकांना ग्रामपंचायतीच्या नावेतून सुरक्षित स्थळी हलविण्यात येत होते. त्यावेळी नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ३२ नागरिकांना बसविण्यात आले होते. नाव कडेने बाहेर जात असताना तिचा पंखा पाण्यातील झाडाला आणि पाईपला अडकला. त्यानंतर नावेतील वजन जास्त असल्याने आणि पंखा अडकल्याने नाव उलटली.
त्यानंतर पाण्याचा प्रवाह जास्त वेगाने असल्याने नावेतील कोणालाही काही करता आले नाही. तर पोहता येणाऱ्या दोघांनी पाण्यात झाडाझुडपांचा आसरा घेतला. मात्र इतर बुडाले. त्यातील १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर आणखी १६ जण बेपत्ता आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या भयानक पूरस्थिती आहे. या पूरस्थितीत पलूस तालुक्यातील २२ गावातील ४ हजार ५६५ कुटुंबांतील २१ हजार ३२ लोकांचे व ५ हजार ८२८ जनावरांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.