बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सलमान खानने मदतीचा हात पुढे केला होता. त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेतले होते. या गावातील पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुर्नबांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे. पडझड झालेल्या 70 घरांच्या पुर्नबांधणीची आर्थिक जबाबदारी सलमानने स्विकारली आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सलमान खानचे आभार मानले आहेत. खिद्रापूर ता. शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी करण्यासाठी एलान फाऊंडेशन (दिल्ली) व अभिनेते सलमान खान यांनी जबाबदारी घेतलेल्या 70 घरांच्या पायाभरणीचा शुभारंभ पार पडला. असे ट्विट त्यांनी केले आहे. मदतीसाठी सलमानवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.