मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सत्ता देणारा नथुराम आता सर्वांनाच आवडायला लागला आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “सचिन अहिर यांना लहान वयातच पवार साहेबांनी सर्वकाही दिलं. त्यांना आमदार, मंत्री बनवलं आणि मोठं केलं. त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून मीसुद्धा बऱ्याचदा मध्यस्थी केली.” असे आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यांसदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, “सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाच आवडायला लागला आहे. गांधी आता सत्ता देऊ शकत नाही त्यामुळे जनता नथुरामच्या पायाशी लोळण घेत आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही पवार साहेब दौरे करत आहेत. साहेबांनी आम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं आहे.” असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एका गाण्याच्या माध्यमातू राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. याशिवाय पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांना पाठवलेल्या शुभेच्छांवरूनही आव्हाड यांनी मोदींवर टीका केली. जर पाकिस्ताना बदमाश देश आहे तर त्यासा चोरून प्रेमपत्र पाठवायची गरज काय ? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
आव्हाड म्हणाले की, “पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचं थांबवलं तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तानकडून कळलं. चाणाक्ष इम्रान खान यांनी ट्विट करून मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवला असं जाहीर केलं. मग नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केलं नाही ? या गोष्टीचा विचार केला तर यातून मोदींचा दुटप्पीपणा दिसतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरून लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे” असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.