वाशिम : बहुजननामा ऑनलाइन – ज्या मातेच्या सुपूत्राने मोठ्या कष्टाने हिंदवी स्वराज्य निर्माण केले, एवढे मोठे साम्राज्य उभारले. त्याच राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याची ओळख व्हावी,आणि यामधून सर्वांना प्रेरणा मिळावी. यासाठी त्यांचे माहेर असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे राष्ट्रमाता जिजाऊनगर असे नामकरण व्हावे. अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासाठी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दि. १ फेब्रूवारीपासून स्वाक्षरी मोहिम राबविणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी सांगीतले. विश्राम भवनावर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. मेटे म्हणाले, सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत.त्यानुषंगाने आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक भारतीय संग्राम परिषद निश्चित लढवीणार आहे. परंतू भारतीय जनता पार्टीने आम्हाला सन्मानजनक सामावून घेतले तरच त्यांच्या सोबत राहू अन्यथा यापुढे भाजपला फुकट किंवा विनाशर्त पाठिंबा राहणार नाही.
आमच्या पक्षाने यापूर्वी मराठा आरक्षण, शिवछत्रपती स्मारक, अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना व त्यासाठी वाढीव निधीची तरतूद, स्पर्धा परिक्षेसाठी उमेदवाराचे पाच वर्षांनी वय वाढविले इत्यादी प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यात निसर्गाचा कायम असमतोल असल्यामुळे सगळीकडे दरवर्षी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सरकारने विशेष निधीची तरतूद करुन महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प राबवीणे गरजेचे आहे.
इच्छाशक्ती घेवून जसा समृध्दी महामार्ग तयार करता येतो. त्याच इच्छाशक्तीने नदीजोड प्रकल्प राबवावा अशी आमची मागणी आहे. तसेच नदीजोड प्रकल्प राबवितांना सर्व जिल्ह्यात लहान-लहान प्रकल्प तयार केल्यास साठ ते सत्तर टक्के राज्य सुजलाम् – सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.सद्यस्थितीत कुठल्याही राजकीय पक्षाकडे बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांसाठी खास धोरण नाही. खरतर ही शोकांतीका आहे. त्यामुळे भारतीय संग्राम परिषद ही बेरोजगार युवकांना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची मागणी सरकारकडे लावून धरणार आहे. तसेच आगामी काळात अनेक जण भारतीय संग्राम परिषदेमध्ये प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.