चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला दिलेल्या घटनादत्त संवैधानिक अधिकारांचे हनन हेतूपुरस्सररित्या राजकीय पुढाऱ्यांमार्फत केले जात आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप हे सर्वच पक्ष आदिवासींचे आरक्षण संपविण्याच्या मार्गावर चालले असून, प्रकाश आंबेडकर यांनीही धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
ही बाब असंवैधानिक असून, आदिवासी समाजातर्फे बिरसा क्रांती दलाकडून या बाबीचा जाहीर निषेध केला जात असल्याची माहिती चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.स्वतंत्र भारतामध्ये समस्त आदिवासी समाजाला परत पारतंत्र्यांत लोटण्याचे षडयंत्र राजकीय पक्ष व पुढाऱ्यांमार्फत केले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या जाहीरनाम्यात धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्याचा मुद्दा नमूद केला आहे. सोबतच जाहीर सभांमध्ये याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून नेहमी आरक्षण देण्याची भाषा वापरली जाते. मात्र, ही बाब असंवैधानिक असून, समस्त आदिवासी समाजातर्फे या षडयंत्राचा निषेध केला जात असल्याचे यावेळी सांगितले. आरक्षणाच्या या षडयंत्राच्या विरोधात आपली सामाजिक व राजकीय आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात बिरसा क्रांती दल, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व समस्त आदिवासी सामाजिक संघटनांद्वारे अधिवेशन आयोजित केले आहे.
या अधिवेशनाला समस्त आदिवासी समाजाने उपस्थित राहून आपल्या संवैधानिक अधिकाराला संरक्षित करण्याचे आवाहन बिरसा क्रांतीदलातर्फे करण्यात आले आहे. पत्रपरिषदेला कमलेश आत्राम, जितेश कुळमेथे, डॉ. पंकज कुळसंगे, कृष्णा मसराम, संगीता येरमे, अमर चांदेकर, किशोर पेदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.