यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनास निवेदन देऊन ओबीसी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली आहे. ओबीसीवर होत असलेला अन्याय त्वरित दूर करावा, अशी मागणी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेने केली आहे.
१३ पॉईन्ट रोस्टर रद्द करून पूर्ववत २०० बिंदूनामावली रोस्टर लागू करावे, प्राध्यापक भरतीत महाराष्ट्र शासनाने लागू केलेले विषयनिहाय आरक्षण बंद करून सर्वांना न्याय देणारे संवर्गनिहाय आरक्षण लागू करावे, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे, नॉन क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण तत्काळ लागू करावे, ओबीसी, एन.टी. व्ही.जे.एस.सी. एसटीचा शासकीय (शिक्षण व नोकरी) क्षेत्रातील ब्लॅकलॉग तत्काळ भरावा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओबीसीचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदूरबार, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील ओबीसीचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे.
तसेच संपूर्ण भारतातील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे भारतीय आहेत. ही भावना ठेवून काश्मिरी विद्यार्थ्यांवर जो हल्ला केला, तो विकृत मानसिकतेचा दर्शन देणारा आहे. अशा प्रवृत्तीवर कार्यवाही करावी, अशी मागणी बीपीएसएसच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी बीपीएसएसचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास काळे, जिल्हा संघटक बाबूसिंग कडेल, यवतमाळ अध्यक्ष कमल खंडारे, माधुरी फेंडर, विदर्भ अध्यक्ष सुनीता काळे, तालुका अध्यक्ष डॉ. संजय ढाकूलकर, अनिता गोरे, अविनाश गोरे, संजय राजगुरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतेष डोमाळे, तालुका सचिव गंगाधर खंडारे, अमोल श्रीरामे आदी उपस्थित होते.