औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नाडीवर हात ठेऊन त्यांना वाचवले असते असा अजब दावा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथे सरकारच्या आरोग्य शिबिरादरम्यान केला. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्याबाबत उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या वक्तव्यावर ट्विटरवरून टीका केली आहे.
खासदार चंद्रकांत खैरे ह्यांना अटक करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे. “एवढी शक्ती होती तर महाराष्ट्राचे लाडके स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांना का नाही वाचवले खैरे साहेब “? असा सवाल आव्हाड यांनी आपल्या ट्विटर पोस्टवरून केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणले कि ‘विज्ञानवादी भारतामधला एक लोकप्रतिनिधी सर्व जनसमुदायाच्या पुढे जाऊन सांगतो की मी नाडी तपासली, भस्म लावला आणि जप केला तर मृत्यूच्या दारात असलेला रुग्ण सुद्धा बाहेर येतो.अनेकजणांना त्याचा अनुभव आलेला आहे. चंद्रकांत खैरेजी आपण लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे प्रतिनिधित्व करता आहात. आपण हा प्रयोग आपल्या जवळच्या लोकांवर का नाही केलात ? हा प्रयोग जर आपण यशस्वीरीत्या केला असता तर मातोश्रीवर देखील बाळासाहेबांसाठी आपल्याला आमंत्रण आलं असतं. माझं आज राज्यसरकारला आव्हान आहे. जादूटोणा कायदा अस्तित्वात आहे ना ? चंद्रकांत खैर हे पहिले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. ज्यांच्यावरती या कायद्यांमुळे गुन्हा दाखल करा.आणि त्यांना आत टाका. महाराष्ट्राला पाषाणयुगाकडे घेऊन जाऊ नका”.
असे सांगत त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली आहे एवढेच नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.