बहुजननामा ऑनलाईन – राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत भाजपाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राइव्हबद्दलही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट फडणवीसांना सवाल केला आहे. फडणवीसांनी दाखवलेला पेनड्राईव्ह अहवालासोबत दिला नव्हता. मग फडणवीसांनी 6.3 जीबीचा कोणता पेनड्राइव्ह दाखवला? केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिले? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केले. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला. त्याला सात महिने उलटून गेली. तो अहवाल दिल्यानंतर अधिवेशनही झाली. या सात महिन्यात भाजपाला याची आठवण का नाही झाली, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने आतापर्यंत जे आरोप केले आहेत ते निराधार आहेत. या प्रकरणाशी महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप फडणवीस आणि भाजपा नेते करत आहेत. त्यात मुद्दे बदलत आहे. पहिला मुद्दा होता अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या. दुसरा आरोप होता परमबीर सिंह यांचे पत्र आणि तिसरा आरोप केला रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अहवालाचा असे सावंत म्हणाले. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केले होते. ज्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध नाही. वेगवेगळ्या काळात झालेल्या या गोष्टी आहेत. यात परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा, याकरता हे केल का? परमबीर सिंह यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला का? भाजपाची हीच व्यूहरचना होती का? यांचे उत्तर काही महिन्यात मिळेल, असे यावेळी सावंत म्हणाले.