पुणे : बहुजनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं गेली साडेचार वर्ष एकमेकांवर टीका केली. त्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये गोडीगुलाबीने पुन्हा एकत्र येत युती केली. मात्र भाजपला सतत पाठिंबा देणारे रिपब्लिकन पार्टी ऑप इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना जागा वाटपात डावलण्यात आले. त्यावरुन रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निवडणुकीसाठी युती झाली ही समाधानाची गोष्ट आहे. पण युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला बाजूला करण्यात आले. युतीच्या चर्चेत आठवले यांना बोलविले नाही तरी चालेल, जागा सोडली नाही तरी चालेल, आठवले आपल्या मागे येतील, असे कदाचित त्यांना वाटत असावे. मला किंवा माझ्या पक्षाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तरी मी बाजूला राहणार नाही. माझ्याशी कोणी वाकडे वागल्यास मी पण त्याला जशास तसे उत्तर देईन. युतीमध्ये एक जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे, असं आठवले यांनी यावेळी बोलून दाखविले.
तसंच युतीच्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. गरज लागली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करू. त्यानंतरही मागण्यांचा विचार झाला नाही तर पक्षाच्या उच्चस्तरीय बैठीकत पुढील दिशा निश्चित करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दारम्यान, शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईची किंवा भाजपने ईशान्य मुंबईतील एक जागा लोकसभा निवडणुकीसाठी द्यावी. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी सात ते आठ जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेनी केली. तसंच सत्तेमध्ये असूनही आम्हाला योग्य वाटा मिळाला नाही. त्याबाबत आम्ही तक्रार केली नाही. आम्ही त्याग केला आहे. आता भाजप-शिवसेनेने त्याग करायला हवा. अपमान होत असेल तर आम्हाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत, असा इशारा आठवले यांनी यावेळी दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला भेटायला बोलविल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.