बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आता मंत्रीपदाच्या वाटपासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात महत्वाच्या खात्यांपैकी एक असणाऱ्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अश्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर राजू शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
‘समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू. ‘अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन मुख्य पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या उमेदवारास जागा मिळावी, यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत.
काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती थोरात यांनी दिली. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील सोबतच काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत दिल्लीत आले असून तेदेखील सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. दरम्यान, नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यातही आपल्या उमेदवाराला संधी मिळावी, म्ह्णून जेष्ठ नेते दिल्ली वारी करीत आहेत.
Visit : bahujannama.com