नवी दिल्ली : वृत्तसंस्था – द्रविडी चळवळीचे जनक पेरियार हे हिंदू देवदेवतांवर कठोर टीका करायचे, असे वक्तव्य एका तामिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केले होते. यावरून तामिळनाडुतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. द्रविडी पक्ष संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून रजनीकांत यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. परंतु, मी खरं तेच बोललो, माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका रजनीकांत घेतली आहे.
तुघलक या तामिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रजनीकांत यांनी म्हटले आहे की, पेरियार हे हिंदू देवदेवतांवर कठोर टीका करायचे. पेरियार यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली सलेममधील सभेत प्रभू रामचंद्र व सीतेचे विवस्त्र फोटो लावण्यात आले होते. परंतु, त्यावेळी त्यांच्यावर कोणीही टीका करायचे नाही. रजनीकांत यांच्या या वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. द्रविडी पक्ष संघटनांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
द्रविडी पक्ष संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना तसेच पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही रजनीकांत आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. पेरियार यांच्याविषयी मी जे काही बोललो ते पूर्णपणे सत्य आहे. याचे असंख्य पुरावे असून पेरियार यांच्या त्या सभेचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.