बहुजननामा ऑनलाईन – आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. ३७१ मतदारसंघात घोळ असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर ५४ लाख मते वाढीव आहेत.यामुळे EVM विरोधात प्रत्येक राज्याराज्यांत उठाव होणार आहे. जर २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्ववास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारले ईव्हीएमची चिप कुठे तयार होते ? यावर निवडणूक आयुक्तांनी अमेरिकेत चिप तयार होत असल्याचे सांगितले. यावर राज ठाकरे म्हणाले ज्या अमेरिकेत गोंधळ सुरु आहे, त्या अमेरिकेत चिप बनते त्यावर आमच्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा ? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह दिसणार नाही. महाराष्ट्रातील लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांच्याकडून बॅलेट पेपरने निवडणूक व्हाव्यात, यासाठी फॉर्म भरून घेणार आहोत. त्या व्यक्तीचे नाव, फोटो आणि सही असलेले फॉर्म जनतेकडून भरून घेतले जातील. २१ ऑगस्टला विरोधकांचा मुंबईत भव्य मोर्चा निघणार असून, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे जनतेने भरलेले फॉर्म देण्यात येतील. यातील हा पहिला टप्पा असेल, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हाव्यात, यासाठी जनतेला आवाहन करत आहोत, त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.
विरोधकांच्या या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, बी. जे. कोळसे पाटील, विद्या चव्हाण, बाळासाहेब थोरात, कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांनी मतदान केले आहे, त्यालाही कळणे गरजेचे आहे की आपण कोणत्या उमेदवाराला आणि चिन्हाला मतदान केले आहे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका- कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.