लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं असून २०१४ ची पुनरावृत्ती करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे.
देशाचा पंतप्रधान कोण होणार यामध्ये उत्तरप्रदेशचा खुप मोठा वाटा असतो येथे लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. यंदा या ठिकाणीही काँग्रेसला अपयश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राज बब्बर यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा पैकी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय प्राप्त झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राज बब्बर आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना फतेपूर सिक्री आणि फारूखाबाद मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे.