मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा देऊ केला होता . त्यावर राजीनाम्याचा आग्रह सोडून काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे, असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने गुरुवारी एकमताने मंजूर केला. मुबंईतील बैठकीत हा ठराव करण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. पराभवाने खचून न जाता विधानसभा निवडणुकीची तयारी करावी. शिवसेना-भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून, निवडणुकीला सामोरे जावे. प्रत्येक जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करून निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे या बैठकीत ठरले. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडला.
आगामी विधानसभा निवडणुकीत सोशल इंजिनअरिंगच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना व नवीन नेतृत्वाला संधी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचे राज्यातून निवडून आलेले एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांशी चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, नसिम खान आदी उपस्थित होते.