नवी दिल्ली वृत्तसंस्था- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच बहुजन समाज पक्षासमोरही हा दर्जा टिकविण्याचे आव्हान आहे.
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या १९६८च्या नियमानुसार, पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळायला हवी तसेच लोकसभेत चार खासदार असतील, तर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. या पक्षांना तीन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतून खासदार निवडून आणतानाच चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळविण्याची कामगिरीही करावी लागते. ही कामगिरी तपासण्याच्या नियमामध्ये निवडणूक आयोगाने २०१६मध्ये बदल केला होता. त्यानुसार, राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी पाच वर्षांऐवजी दहा वर्षांच्या कामगिरीचा विचार करण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील सात पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्षांना निवडणूक आयोगाच्या अटी आणि शर्ती पूर्ण न करता आल्यामुळे राष्ट्रीय पक्षाची मान्यता जाण्याची शक्यता आहे.
कोणते आहेत राष्ट्रीय पक्ष ?
भारतीय जनता पार्टी
इंडियन नॅशनल काँग्रेस
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
भारतीय कम्युनिस्ट पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस
बहुजन समाज पक्ष
तृणमूल काँग्रेस