पुणे : बहुजननामा ऑनलाईन – स्थायी समितीची बैठक आज अचानकपणे ‘कुठल्याही’ कारणाशिवाय अर्ध्या मिनिटात तहकूब करण्यात आली. यामुळे काहीवेळ अगोदर कार्यपत्रिकेचा अभ्यास करणाऱ्या स्थायी समिती सदस्य , विशेष असे की सत्ताधारी पक्षातील सदस्यांनाही ‘धक्का’ बसला.
स्थायी समितीची आज बैठक होती. बैठकीसाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह स्थायी समितीचे अन्य 15 सदस्य ही उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभागृहात सदस्य व अधिकारी जमले. परंतु काही कळायच्या आतच बैठक तहकूब झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बैठक तहकूब का झाली ? याचे कारणही कोणाला कळू शकले नाही. दस्तुरखुद्द सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही तहकुबीचे कारण न समजल्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहण्या व्यतिरिक्त हाती काहीच नसल्याने शांत बसावे लागले. विशेष असे की प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही तहकुबीचे कारण न समजल्याने ‘ तहकुबी ‘ मागे नेमक्या हेतू न समजल्याने ‘संशयाचे’ धुके दाटले आहे.
आजच्या कार्यपत्रिकेवर कोंढवा येथील सिव्हीक कल्चरल व कम्युनिटी सेन्टरचे अर्धवट काम करण्यासाठीची निविदा मंजूर करण्याबाबत 26 फेब्रुवारीला स्थायी समिती ने दप्तरी दाखल केलेल्या विषयाचा फेरविचार मान्यतेसाठी होता. यासोबतच रामनगर वारजे येथे मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग क्र. 28 ब मधील स.न. 585 मधील क्रीडा संकुलाचे उर्वरित काम करणे, प्रभाग क्र. 2 धानोरी लाईट हाऊस व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीचे पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे काम करणे या कामाच्या निविदा होत्या.
यासोबतच हडपसर येथील रस्ता रुंदीकरणात भाड्याने दिलेल्या गाळ्यांचे हस्तांतरण करण्याचे धोरण ठरविणे, मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करामध्ये सूट देणे, एमपीएससी, यूपीएससी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर निधी देणे, वारजे व कर्वेनगर येथे महिलांना तायक्वांदो प्रशिक्षण देणे, समाज विकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ अनाथ व्यक्तींना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे, शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवाकरिता राखीव असलेला 5 टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करणे, तसेच अंदाज पत्रकात विविध सार्वजनिक संस्थानच्या नावे मान्य झालेल्या देणगीची रक्कम अदा करणेस मान्यता देण्याचा प्रस्ताव कार्यपत्रिकेवर होते.
विशेष असे की एरव्ही काही कारणास्तव किंबहुना कोणाच्या तरी निधनामुळे सभा तहकूब केल्या जातात. तहकुबी पूर्वी ऐनवेळी येणारे प्रस्ताव दाखल करून घेतले जातात. आर्थिक वर्षाच्या शेवटीतर विविध खात्यांकडून येणारे विषय बैठकीत पोहोचेपर्यंत सभेचे कामकाज रेंगाळत चालवले जाते. आज मात्र अवघ्या मिनीटभरात सदस्यांनाही न कळू देता व तहकुबीचे कुठलेही कारण न देता सभा 30 मार्चपर्यंत तहकूब केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना विचारणा केली असता, त्यांनी केवळ आजची सभा पुढील आठवड्यात घेण्यात आली आहे असे माफक उत्तर दिले.