हिंजवडी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाल्याने एका कर्जबाजारी व्यक्तीने देणेकऱ्यांना हुलकावणी देण्यासाठी अनोखी शक्कल लढवत आपल्या 15 वर्षापूर्वी एकाच कंपनी काम करत असलेल्या मित्राचा खून केला. या प्रकरणातील आरोपीला हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छडा लावला आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या ब्ल्युटुथवरुन आणि शिवभोजन थाळी सेंटर येथील फोटोवरुन या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मेहबूब दस्तगीर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीवर कोट्यावधींचे कर्ज असल्याने ओळखीच्या व्यक्तीचा खून करुन बाणेर येथील दर्ग्याजवळ त्याचा मृतदेह जाळला आणि तो व्यक्ती आपण स्वत:च असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करुन आरोपीला अटक केली. आरोपीने संदीप पुंडलिक माईनकर या व्यक्तीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्याच्या बाणेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता. तेव्हा, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने निरीक्षण केले असता मयत व्यक्तीच्या खिशात एक अर्धवट जळालेली चिठ्ठी मिळाली. तसेच घटनास्थळी कानातील ब्ल्यूटुथही मिळाले. चिठ्ठीवरुन मयत व्यक्तीचे नाव संदीप असल्याचे समोर आले. तर, ब्ल्युटुथ कोणाचे यावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला.
याचदरम्यान काळेवाडी येथून आरोपीच्या पहिल्या पत्नीने मेहबूब संशयितरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. संबंधित घटनेविषयी पत्नीला काहीच माहित नव्हते. अखेर पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन ब्ल्युटुथचा तपशील आणि इतर चौकशी केल्यानंतर आरोपी हाच असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीवर कोट्यावधीचे कर्ज होते, शिवाय दोन पत्नी असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. हिंजवडी पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. पोलिसांनी दिल्लीत शोध घेतला मात्र तो तेथूनही निघून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर पुण्याहून आलेल्या आणि पुण्याला गेलेल्या प्रवाशांची यादी तपासली. यामध्ये तो त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पुन्हा पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाले आहे. देणेकऱ्यांचा तगादा टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केले. यातून त्याने मयत व्यक्ती ही आपण असल्याचे भासवून देणेकऱ्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा डाव आखला होता. त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी कर्जबाजारी झालो असून मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल, असे लिहले. तो स्टॅम्प पेपर स्वत:कडे ठेवला.
आणि डाव फसला
आरोपी आणि मयत हे दोघे काही वर्षापूर्वी एका कंपनीत कामाला होते. ते एकमेकांना चांगले ओळखत होते. तसेच मयत व्यक्तीला दारुचे व्यसन होते आणि त्याला कोणीच विचारत नसल्याने आरोपी मेहबूब याने संदीपची निवड केली. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मेहबूब आणि संदीप भेटले. त्याने संदीपला त्याच्या वाकड येथील घरी नेले. घरी दोघांनी चहा घेतला. त्यानंतर मेहबूब आणि संदीप दुचाकीवरुन बाणेरच्या दिशेने गेले. त्यावेळी आरोपीने बॅग घेतली. संदीपला ठार मारल्यानंतर मेहबूबने मृतदेह जाळून दर्ग्याच्या भिंतीजवळ टाकून दुसऱ्या पत्नीसोबत पळून गेला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचे बिंग फुटले आणि डाव फसला.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर आर पाटील, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरदार यांच्या मार्गर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, बंडू मारणे, किरण पवार, महेश वायबसे, अतिक शेख, हनुमंत कुंभार, कुणाल शिंदे, गणेश शिंदे, विजय घाडगे, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडु, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुले, सहायक पोलीस निरीक्षक अमरिश देशमुख, अजिनाथ ओबासे, गोविंद चव्हाण, मौहम्मद नदाफ, प्रविण दळे यांच्या पथकाने केली आहे. तर तांत्रिक बाबीचे काम सुभाष गुरव, प्रशांत सईद, शंकर चिचंकर व माळी यांनी केले.