बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील वातावरण तांपले(Chandrakant Patil) आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना आणि कॉंग्रेस आमने सामने आली आहेत. त्यात आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतर विषयावर भाष्य केले. पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याबाबत शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसवलेले आक्रमकांचे पुतळे हटवले आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पुणे पालिकेत याबाबतचा ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल.
… तोपर्यंत भाजप- मनसे युतीवर नाही
मनसे सोबतच्या युतीबाबत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची चर्चा केली नसल्याचे महत्वपूर्ण भाष्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केेले आहे.