बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र येऊन लढल्यास विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपपुढे( BJP) मोठे आव्हान उभे राहील.
या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा राखायची जबाबदारीही त्यांच्यावर अधिक राहाणार आहे. व्यवस्थित मतदार नोंदणी करून निवडणूक जिंकायची असे भाजपचे तंत्र आहे आणि त्याकरिता आवश्यक तेवढे संघटनेचे बळ आहे. परन्तु महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आल्यास भाजपला आव्हान मिळू शकते. मतदारसंघातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा जोर आहे. पुणे शहर आणि कोल्हापूर शहर भागातून काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीला पूरक ठरू शकते. आघाडी एकत्र आल्यास उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल असे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीत मतदार नोंदणी केली पण पक्षात फाटाफूट झाली आणि त्याचा फायदा भाजपच्या चंद्रकांत पाटलांना झाला ही बाब विचारात घेतल्यासआघाडीचे एकत्र येणे भाजपला आव्हान का ठरू शकते? हे लक्षात येईल.
भाजपचा जास्त भर पुणे शहरातील मतदारांवर आहे. याकरिता भाजपने मतदार नोंदणीसाठी पुण्यात विशेष अभियान राबविले. उमेदवार पुणे शहरातील नसेल तर भाजपचे मतदार मतदान किती प्रमाणात करतील? याविषयी भाजप साशंक आहे. पक्षातील सूत्रांनुसार भाजपचा पाया गेल्या पाच वर्षात ग्रामीण भागातही रोवला गेला आहे.