बहुजननामा ऑनलाइन टीम – येरवडा कारागृहात ओळख झाल्यानंतर दोन सराईत गुन्हेगारात मोठा गुन्हेगार कोण यावरून वादावरून एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करून खून केला. आंबील(Aarapees murder case) ओढ्याजवळ झालेल्या खून प्रकरणात अटक केली असता, या खुनाचे कारण स्पष्ट झाले आहे. दत्तवाडी पोलिसांनी त्याला पकडले.
अक्षय राम गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. सूरज भालचंद्र यशवद (वय २३) असे खून झालेल्या तडीपाराचे नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज यशवद हा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. आरोपी अक्षय गायकवाडवर दरोडा व इतर गुन्हे दाखल आहेत. शिक्षा भोगत असताना दोघांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. दरम्यान, अक्षय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून बाहेर आला आहे. तर सूरज तडीपारीचा भंग करून शहरात दाखल झाला होता.
दोघेही रविवारी रात्री आंबिल ओढा परिसरात भेटले. त्यांच्यात बोलत असताना दोघांपैकी कोण मोठा गुन्हेगार यामुळे वाद झाला. त्यामुळे सूरजने अक्षयला तुझे जितके वय आहे, तितके माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. तू जास्त शहाणपणा करू नकोस असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर अक्षय तेथून रागाने निघून गेला. काही वेळाने तो चाकू घेऊन बाहेर आला. त्याने रस्त्यातच सूरजला गाठून चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सूरजला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कर्मचारी कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, शरद राऊत, अक्षकुमार वाबळे, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांनी अटक केली.