कोपरगाव : बहुजननामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. मागील तीन वेळा काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार शिर्डी मतदारसंघात निवडून आले नाहीत. रामदास आठवले यांचा पराभव देखील यांनीच केला. असे सांगून राजकारणातील पळपुटेपणा राहुल गांधी बारामतीतून शिकले की काय? अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
मोदी सरकारचा नोटाबंदी निर्णय देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ठरला. प्रत्येक गोष्टीला जसा अंत असतो, तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजकीय अंत होणार आहे. इथल्या सुशिक्षित, अनुभवी व जाणकार लोकांनी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. यंदाची २०१९ची लोकसभा निवडणूक म्हणजे गेल्यावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.