पुणे : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसमध्ये अगोदर प्रवेश करा असा दिल्लीतून निरोप मिळाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तातडीने संघटनाच्या जोरावर प्रचाराला सुरुवात केली. आता तिकीट निश्चित झाल्याचे सांगितले जात असतानाच काँग्रेसने पुन्हा एकदा सर्वांना धक्का देत बहुजनांचा चेहरा असलेल्या प्रवीण गायकवाड यांना तिकीट न देता निष्ठावंत मोहन जोशी यांना तिकीट जाहीर करुन पुणे शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे विविध बहुजन संघटनांचे कार्यकत्यांचा राग अनावर झाला असून रात्रीपासून आता ‘प्रवीणदादा तुम्ही लढाच’ असे एसएमएस फिरु लागले आहेत.
आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यावरुन नाही तर लाल महालातून चालणार अशी घोषणा करीत प्रवीण गायकवाड यांनी प्रचार सुरु केला असताना अचानक काँग्रेसने मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा प्रवीण गायकवाड यांना आता तुम्ही पाऊल उचलले आहेच तर अपक्ष म्हणून लढा असे आवाहन केले आहे.
कार्यकर्ते जरी आग्रह करीत असले तरी मात्र, याबाबत अजून काहीही ठरले नाही, असे गायकवाड यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांचा मोबाईल बंद असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी हिंदुत्वाच्या आधारावर पुन्हा युती केली. या जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी बहुजनांचा आधार घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीला उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विविध जातीजमातींच्या छोट्या छोट्या पक्षांची मोठ बांधण्यास सुरुवात केली.
गेली अनेक वर्षे मराठा समाजाबरोबर या विविध संघटनांशी असलेल्या संबंधामुळे एक मोठी वोटबँक पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. काँग्रेसमध्येही अगोदर मोहन जोशी, अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. पण प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आल्यानंतर इतरांची चर्चा बंद झाली होती.
काँग्रेसची एक पद्धत आहे. पक्षात असलेल्यांनाच तिकीट दिले जाते. तुम्ही आधी पक्षात प्रवेश करा असा संदेश राहुल गांधी यांच्या नजिकच्या वर्तुळात असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांना निरोप दिला. त्यानुसार प्रवीण गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांस मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी खर्गे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यात येऊन प्रचाराला सुरुवात ही केली. रविवारी लाल महालात गायकवाड यांनी सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला लढा कोणाविरुद्ध आहे हे स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्यांनी पुण्याचा कारभार शनिवारवाड्यावरुन नाही तर लाल महालातून चालेल अशी घोषणा दिली होती. मात्र, काँग्रेसने नेहमी प्रमाणे अनपेक्षित निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांना अपक्ष लढण्याचा आग्रह केला जात आहे.