भिवंडी : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची फेरी करत पक्षनेते जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आता कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असताना वंचित आघाडीच्या एका नेत्याने प्रकाश आंबेडकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळणार असल्याचे सांगून टाकलं आहे. या उमेदवाराने आपल्या प्रचारसभेच्या भाषणा दरम्यान ही घोषणा केली आहे.
या प्रचारसभेचा विडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जातीच्या आधारे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांपैकीच भिवंडी पश्चिममधून सुहास बोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी सुहास बोंडे यांनी भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महत्वाचे म्हणजे सुहास बोंडे हे खान्देश सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच त्यांनी मी भिवंडीकर संघर्ष समितीची स्थापना देखील केली आहे.
समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून ते नागरी समस्याविषयी विविध आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने अजूनतरी कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे समजले आहे. मात्र, आता त्यांनी विधानसभरच्या रिंगणात देखील उडी घेतली आहे. या भिवंडी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश चौघुले, ,काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष शोएब गुड्डू, राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊन एमआयएम पक्षाकडून खालिद गुडू , तसेच मनसे, बसपा पक्षाचे उमेदवार देखील रिंगणात उतरले आहेत.
Visit : bahujannama.com