मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपाने आव्हान दिल्यापाठोपाठ आता अॅड. प्रकाश आंबेडकरांनीही पवारांविरोधात माढामधून वंचित आघाडीचा उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईत रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेससह भाजपावरही अॅड. आबेडकरांनी यावेळी टीका केली.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुद्द्यावर ही चर्चा अडकली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी काय उपाय योजना करणार, ते काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीकडे वेळ कमी आहे. काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्याशिवाय काँग्रेस सोबत आघाडी करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसबरोबर निवडणुकपूर्व आघाडी झाली नाही, तरी निवडणुकींनतर आघाडी होऊ शकते, असेही आंबेडकर म्हणाले.
भाजपा अध्यक्ष अमित शहा पुणे दौऱ्यात राज्यातील बोलताना लोकसभेच्या 48 जागा जिंकण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावर आंबेडकर म्हणाले, शहा यांनी किमान 40 मतदारसंघात व्ही पॅट मशिन लावून त्याची प्रिंट मिळेल अशी व्यवस्था करावी. म्हणजे ते किती यशस्वी होतील हे आपल्याला पाहता येईल. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकाधिक उमेदवार विजयी होण्यासाठी तयारी केली असून त्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर 23 फेब्रुवारी रोजी ओबीसी परिषद आयोजित केली आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित होतील, असे त्यांनी सांगितले.
देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. भाजपाची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवला जात आहे. लेखक आणि कलावंतांना सार्वजनिक व्यासपीठावरून सरकारविरोधी मते मांडू दिली जात नाहीत. दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या भाषणात त्यामुळेच व्यत्यय आणण्यात आला. हे हुकूमशाही वृत्तीचे द्योतक आहे. आम्ही मनमानी करू शकतो हे दाखवण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. अमोल पालेकर हे फॅसिस्ट अजेंड्याचे बळी आहेत, असा आरोपही अॅड. आंबेडकरांनी केला.