मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – NRC आणि CAA ला घेऊन देशभरात तीव्र विरोध सुरू आहे.याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे. महाराष्ट्र बंद बाबत नुकतीच आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दादर टीटी चे आंदोलन ज्या पद्धतीने शांततेत पार पाडण्यात आले त्याच पद्धतीने २४ चा बंद शांततेत पार पाडणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे पत्रकारांशी बोलताना आंबेडकरांनी सांगितले.
NRC आणि CAA चा हिंदूंनाही फटका बसणार असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले. जवळ जवळ ४०% हिंदू समाजातील नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. याची यादी आपण लवकरच जाहीर करणार असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकीकडे NRC आणि CAA ला काँग्रेस पक्ष तीव्र विरोध करीत असतानाच पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री, खासदार कपिल सिब्बल यांनी NRC,CAA हा सर्व राज्यांना हा कायदा लागू करावाच लागेल असे वादग्रस्त विधान केले आहे त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी ‘केंद्राचा कायदा सर्व राज्यांना लागू होतो ही गोष्ट खरी आहे. पण राज्यांना वेगळं मत मांडण्याचा अधिकार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.