मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ फेब्रुवारीला दादर येथील शिवाजी पार्कवर ‘ओबीसी आरक्षण परिषद’ घेण्यात येणार आहे. ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून कायदा करावा, तसेच आगरी-कोळी-भंडारी यासारख्या भूमिपुत्रांच्या गावठाणांच्या जमिनीचे मालमत्ता पत्र (प्रॉपर्टी कार्ड) त्यांच्या नावाने द्यावे. आणि त्यांच्यावर झोपु योजना व समूह विकासाची बळजबरी न करता त्यांना स्वयंविकासाचा अधिकार राज्य सरकारने द्यावा. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर पुढे म्हणाले, खासगी कंपन्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये घटनात्मक आरक्षण लागू करावे. ओबीसी आरक्षणात कोणत्याही उच्चवर्णीय जातीस घुसखोरी करू देऊ नये. मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी करावी. ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे. अर्थसंकल्पात ५२ टक्के ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनुसार निधीची तरतूद करावी.
तसेच समुद्रावरील जलवाहतूक, पर्यटन, आधुनिक सागरी व्यापार, सागरी नोकऱ्या, सागरी पोलीस, नौदल यामध्ये मच्छीमारांना ३० टक्के आरक्षण देण्याची गरजही आंबडेकर यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा गायकवाड अहवाल रद्द करावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.