नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – नांदेड जिल्हा परिषद हायस्कुल मैदानावर धनगर समाज आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. आता आरक्षणाशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निश्चय उपस्थित धनगर बांधवांनी करून एल्गार पुकारण्याचे संकेत दिले. यावेळी ॲड. शिवाजीराव हाक्के अध्यक्षस्थानी होते. उत्तमराव जानकर, प्रा. डॉ. यशपाल भिंगे, संभाजीराव धुळगंडे उपस्थित होते.
मेळाव्या बोलताना धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्य शासनाने धनगर समाजाचे आरक्षण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जाहीर करावे. आता आम्ही आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धनगर समाजास आरक्षण देण्याचे आश्वसन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. पण चार वर्षे संपले तरी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटी आहे. तरीही धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष होते आहे. राज्य सरकारने केवळ दोन ओळीचे सुधारित परिपत्रक जारी केल्यास धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील प्रमाणपत्र मिळेल. धनगड समाजातील एकही व्यक्ती राज्यात नसून ढ आणि ध या वाक्यातील फरक व संभ्रमामुळे समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. उत्तम जानकर म्हणाले, की धनगर समाजाला आरक्षण मिळण्याआठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी विधानसभेत धनगर समाजाचे आमदार वाढविणे आवश्यक आहे. राज्य मंत्रिमंडळात धनगर समाजातील मंत्र्यांना कमी महत्वाचे खाते दिले असून अधिकारही फारसे दिले नाहीत. ॲड. शिवाजी हाक्के, संभाजी धुळगंडे, शुभांगी पा. सुगावकर, अशोक पाटील रावीकर, डॉ. रामराव श्रीरामे यांनी मगोगत व्यक्त केले.
धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडळापूरकर यांनी प्रास्ताविक केले. येत्या एक महिन्यात धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा सर्व पक्षातील समाज बंधाव रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करतील, असे ते म्हणाले. गंगासागर पाटील सुगावकर, माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, दिलीप बंदखडके, लक्ष्मीबाई कामजे, व्यंकटराव दबडे, ॲड. शिवराज पाटील कुंद्राळकर, रावसाहेब पा. माकनीकर, दशरथ नाईक, डॉ. एस. आर. नाईक, यशवंतराव सकनूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.