सातारा : बहुजननामा ऑनलाइन – आज सर्वत्र सामाजिक सलोखा बिघडत चालला असून भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवणे काळाची गरज आहे. त्यासाठी घराघरात मॉंसाहेब जिजाऊ निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर यांनी केले.
लोणंद येथे मराठा समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माँसाहेब जिजामाता जयंती उत्सव व सक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी शानू चंद, सरस्वती कदम, सुषमा निंबाळकर, शितल इंदलकर, कोमल कुथवळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मराठा समाज मंडळाच्या वतीने संक्रांतीनिमित्त लोणंद शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पाहुण्यांचा परिचय सरोजिनी जाधव यांनी केला. स्वागत साक्षी जाधव व श्रवणी इंदलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा पानवकर यांनी केले. आभार विद्या गायकवाड यांनी मानले. यावेळी मराठा समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.