चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – मागच्या तीन निवडणुकांमध्ये राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्या जागा आम्ही काँग्रेसकडे मागत आहोत. मात्र अश्या पडणाऱ्या जागाही काँग्रेस आम्हाला देण्यास इच्छुक नाही. असा टोला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
आगामी निवडणुकांसाठी सगळेच पक्ष सज्ज झाले आहेत, दरम्यान भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी चंद्रपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेसने राजकीय शहाणपणा दाखवावा. आम्ही कॉंग्रेसकडे १२ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यातील ज्या लोकसभा मतदार संघात मागच्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्या जागा आम्हाला द्या अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र ज्या लोकसभा मतदार संघात त्यांचा पराभव होतो त्या सुद्धा जागा काँग्रेस आम्हाला देण्यास तयार नाही. याअर्थी कॉंग्रेसने राजकीय शहाणपणा दाखविण्याची गरज आहे. काँग्रेसने हे शहाणपण दाखविले नाही तर त्यांना अधिक नुकसान सहन करावे लागेल. असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान केले तर ते तुमच्या बॅंकेतील पैसा गायब करतील. त्यामुळे पुन्हा मोदी पंतप्रधान होणार नाही, याची काळजी घ्या. असे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर रिझर्व बॅंकेतील पैसाही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवा आहे. ते रिझर्व बॅंकेला खाली करण्याच्या मागे लागले आहे. यासाठी मतदारांनी हुशार राहण्याची आवश्यकता आहे. असेही त्यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले.
या जाहीर सभेत एमआयएम नेते खासदार असासुद्दीन ओवैसी देखील उपस्थित रहाणार होते. मात्र काही कारणास्तव ते या सभेत हजर राहिले नाहीत.