पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलताना आरोप केला आहे. सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले. दिल्लीची दंगल ही पूर्वनियोजित होती. या दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच अशा दंगली पुन्हा झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. २५ लाख सैनिकांचे गणवेश विकण्यात आल्याचे एका अहवालानुसार समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांना ही गावरान सत्ता वाटत असल्यामुळे त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काळजीचे कारण नसल्याची विधाने करायला सुरुवात केली आहे. या मंत्र्यांना हे प्रश्न केंद्राचे आहेत असून यात राज्य काही करू शकत नाही, हे वायफळ विधान करण्यापूर्वी समजून घ्यायला हवे, असा टोला लगावतानाच सत्तेशिवाय जगू न शकणारी ही मंडळी प्रश्नाचे गांभीर्य घालवत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत अपुऱ्या माहितीच्या आधारे राज्यातील मंत्री वायफळ बडबड करत आहेत. त्यांची ही विधाने अडचणीची असून नागरिकत्व गेल्यावर एक दिवस लोकच या मंत्र्यांच्यापाठी दगडं घेऊन लागतील.
तसेच सीएएचा कोणताही धोका नसल्याचे इतर मागासवर्गीय समाजाला सांगितले जात आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बाहेरील देशातील नागरिकांना हाकलल्यावर त्यांची मालमत्ता इतर मागासवर्गात वाटून दिली जाणार असल्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सीएए कायद्याची सत्य माहिती समजावी म्हणून इत्तर मागासातील लहान-लहान जातींचे मेळावे व बैठक घेण्यास सुरुवात केली आहे, असेही त्यांनी सांगितले. तर सोलापूर लोकसभेचे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकीची पाच वर्षे न्यायालयीन लढाईत जाईल.
दरम्यान आंबेडकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही टीका केली असून अर्थसंकल्पात ८ हजार कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात मात्र १६ हजार कोटींची तूट आहे. ते म्हणाले की, राज्याने दाखवलेली ८ हजार कोटींची तूट आणि केंद्राकडून मिळणारे ८ हजार कोटी अशी १६ हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष तूट आहे. तसेच सत्तेसाठी राज्यातील काँग्रेस आघाडीची शिवसेनेमागे फरफट सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.