लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – कोणत्या ना कोणत्या विधानावरून नेहमी चर्चेत असणारे भाजपाचे उमेदवार वरुण गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान, असं वादग्रस्त विधान वरुण गांधींनी प्रचारादरम्यान केलं ते पिलीभितमध्ये एका प्रचार सभेत बोलत होते. समाजवादी पार्टी आणि बसपाचे महागठबंधन पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा, असे आवाहनही वरूण गांधीं यांनी यावेळी केले.
ज्यावेळी देशात बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी तत्कालीन मुलायम सिंग सरकारने राम भक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात जवळपास पाचशे जणांनी आपले प्राण गमाविले होते. मुलायम यांचे हात रक्ताने माखलेले आहेत आणि आम्ही ते विसरू शकणार नाही, तुम्ही भारतासोबत आहात की पाकिस्तानसोबत, असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला केला. तुम्ही महागठबंधनला मतदान करणार असाल, तर ती सर्व मंडळी पाकिस्तानची आहेत. यात काही चुकीचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यांच्यावर जोरदार टीका केली.
याआधी आधी वरुण यांच्या आई आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते .’तुम्ही मला मतदान करा. अन्यथा मी निवडून आल्यावर तुम्ही काम घेऊन याल, तेव्हा मी त्याला प्रतिसाद देणार नाही,’ अशी धमकीच त्यांनी दिली होती.