बहुजननामा ऑनलाईन – भारत मागील चार दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना करत आहे. माणूसकीला काळिमा फासणाऱ्या आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या शक्तीना त्यांची धोरणे सोडावीच लागणार आहे. भारताने दहशतवादाविरोधात जी पावले उचलली त्याला युएई ने नेहमीच पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमीरात (युएई)च्या दौऱ्यावर असताना त्यांनी युएईच्या खलीज टाईम्सशी संवाद साधताना असे स्पष्टीकरण दिले.
मोदी म्हणाले की, जेथे कलम ३७० चा प्रश्न येतो तर भारताने घेतलेला हा निर्णय लोकशाहीला अनुसरुन आणि पारदर्शी आहे. काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी जम्मू कश्मीरचा विकासात अडथळे येत होते. जम्मू कश्मीरचा एकटेपणा दूर करण्यासाठी आणि तेथील विकासासाठी ठोस पावले उचलली जाणाऱ आहेत. एकटेपणामुळे कितीतरी तरुण वाईट मार्गाला लागले. त्यांनी दहशतवादाचा, हिंसाचाराराचा मार्ग स्विकारला. देशाच्या विकासासाठी आम्ही अशा प्रवृत्तींना समाजात पाय रोवू देणार नाही.
मुलाखतीत मोदी यांना पुढील वर्षी अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे, ज्याचा फार वाईट परिणाम होऊ शकतो. भारत आणि युएई दरम्यानची आर्थिक भागीदारी या वाईट वेळेवर मात करु शकते का. असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. आम्ही पुढील पाच वर्षात पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युएईदेखील आपली अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण करीत आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या पारंपारिक क्षेत्रापलीकडे जात आहे. समृद्धी मिळविण्यासाठी आपल्याकडे विचार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. वेग आणि संसाधने आहेत. भारत आणि युएईमधील वाढता तालमेळ आणि कोट्यावधी भारतीयांमुळे आपली अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक ठरू शकते.