मुंबई बहुजननामा ऑनलाइन : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर गेले साडेचार वर्षे केंद्र व राज्य सरकारवर टिका म्यान केलेल्या सामना तून आज परत एकदा भाजपावर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदी आणि बेरोजगारी मुळे नोटबंदीच्या निर्णयात असल्याचे सांगत सामनाच्या अग्रलेखातून टिकास्त्र सोडले आहे. मोदी यांनी नवा भारत ची घोषणा केली़ तो भारत सगळ्यांची काळजी घेणारा असावा हे स्वप्न होते. पण नव्या भारतात गेल्या दोन वर्षात दोन कोटींवर लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेकारी वाढली. लोकांच्या घरातील चुलीही विझल्या, अशा शब्दात टिका करण्यात आली आहे.
मंदी आणि बेरोजगारीचे मुळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. नोटबंदीत अनेकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा झाला हे मान्य केले पाहिजे. पण कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, हे सुद्धा कटू सत्य आहे. नोटबंदी ज्यांच्या कारकिर्दीत झाल ते अरुण जेटली दिल्लीच्या रुग्णालयात जीवन मृत्युशी संघर्ष करत आहेत आणि आणखी एक माजी अर्थमंत्री चिदंबरम हे भष्ट्राचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. अर्थमंत्री सीतारामन सांगतात हा भ्रष्टाचार नोटबंदीनंतरचा म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्ट्राचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे. विकासाचे स्वप्न कसे खोटे आहे, ते परवा बिहारात दिसले.
माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांना सलामी देण्यासाठी वर केलेल्या पोलिसांच्या बंदुकांतून एकही गोळी सुटली नाही. आमची अर्थव्यवस्था त्या फसलेल्या तोफांच्या सलामीसारखीच झाली आहे. सीतारमण यांनी तेच सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरु आहेत काय ? ते लवकरच दिसेल असे म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून टिका केली आहे. नोटबंदीनंतर शिवसेनेने प्रखर टिका केली होती. जवळपास साडेचार वर्षे सरकारमध्ये राहूनही शिवसेना केंद्र व राज्य सरकारवर टिका करत होती़ मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेकडून केंद्र व राज्य सरकारचे गुणगान सुरु होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी युतीत जागा वाटपाचा प्रश्न समोर येणार असल्याने दबावातून शिवसेनेने हे टिकास्त्र पुन्हा सुरु केले की काय अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे.