मुंबई बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. जर काही नेते पक्ष सोडून गेलेच तर त्यांच्या जागी कोण उमेदवार असावा यासाठी राष्ट्रवादीने बी प्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीने आपल्याच काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. मराठवाड्याची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे.
‘असा’ असणार काँग्रेस राष्ट्रवादीचा ‘बी प्लॅन’
कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. येथून आता धैर्यशील कदम यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसच्या जयकुमार गोरे यांनी पक्ष सोडल्यास माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशम यांची वर्णी लागू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यात मोडकळीस आल्याचे दिसत आहे. साताऱ्याच्या जागेसाठी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांचं नाव पुढे येत आहे. फलटण मतदारसंघात रामराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडल्यास येथून दिगंबर आगवणे यांचं नाव पुढे येताना दिसत आहे.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट मतदारसंघात माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान खासदार सिद्धराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभेत भाजपचं काम केलेले नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ स्वामींना काँग्रेसकडून तिकीट देण्याची शक्यता आहे.
माळशिरस मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता एकही सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीकडून अजूनही उमेदवाराचा शोध सुरु आहे.
बार्शी मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार आहेत. असे झाले तर माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील हे इच्छुक असतील. राजा राऊत हे देखील भाजपचा झेंडा हाती घेऊ शकतात.
करमाळा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर संजयमामा शिंदे यांना रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. त्यांनी याआधी लोकसभा लढवलेली आहे.
पंढरपूर मतदारसंघातून विद्यामन काँग्रेस आमदार भारत भालके भाजपात जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे गेल्या विधानसभेत शिवसेनेकडून लढलेले उद्योजक समाधान आवताडे यांना काँग्रेस आघाडीकडून तिकीट दिलं जाऊ शकतं.
इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे असून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. हर्षवर्धन पाटील सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. याशिवाय अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादीचा असेल.
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे शिवसेनेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आघाडीचे शिवाजी कांबळे यांना गळाला लावलं जाऊ शकतं.