नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – व्यक्तीस्वातंत्र्य हे संविधानाचे सौंदर्य आहे. मात्र आज माणसाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरच गदा आणली जात आहे. धार्मिक उन्मादाला तथाकथित राष्ट्रवाद्यांकडून प्रोत्साहन दिले जाते. ते लोकशाहीसाठी धोकादायक ठरत आहे, असे प्रतिपादन १८ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहुल वानखेडे यांनी केले.
सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात १८ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल किर्ती, स्वागताध्यक्ष नौनिहालसिंह जहागीरदार, संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे, निमंत्रक जी. पी. मिसाळे, साहित्यिक रविचंद्र हडसनकर, डॉ. राम वनंजे, डॉ. नागेश कल्याणकर, रमेश सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वानखेडे म्हणाले, माणसाचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे संविधान सौंदर्यच आहे. जोपर्यंत आंबेडकरवाद्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील गुलामगिरी संपत नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेले नाही. उद्घाटकीय सत्राचे प्रास्ताविक सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. ॲड. विजय गोणारकर यांनी सूत्रसंचालन केले.
उदघाटकीय भाषणात डॉ. बबन जोगदंड म्हणाले, की आंबेडकरी चळवळीत अंतर्विरोध मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपापसात संघर्ष सुरु असून शिकलेपणाचा राजकीय व सामाजिक वाटचालीत फारसा फायदा होत नाही. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आपण सोयीस्कररित्या विसरलो आहोत. आपल्या राज्यकर्त्यांत, अधिकारी, साहित्यिकांतही एकी नाही, ते एकमेकांच्या विरोधात लिहितात, हे थांबायला हवे. खरे तर आंबेडकरी विचारांचे साहित्य खूप आलेले आहे. पण आता वास्तववादी साहित्य प्रकाशित होण्याची गरज आहे. त्यासाठी नवलेखकांना प्रोत्साहन देण्याची, त्यांचे साहित्य प्रकाशित होण्यासाठी मदत करण्याची गरज त्यांनी या वेळी बोलून दाखविली.
दरम्यान, डॉ. बबन जोगदंड यांच्या कृषी संपादक महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विविध पैलू या आंबेडकरी चळवळीतील महत्त्वपूर्ण दोन ग्रंथांचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा साहित्यभूषण पुरस्कार प्रा. संध्या रंगारी, कवी अनुरत्न वाघमारे, डॉ. अनिल काळबांडे यांना तर सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार, प्रा. गजानन देवकर, पंढरीनाथ केंद्रे, गणेश वाघमारे व सतीश कमलेकर यांना प्रदान करुन गौरविण्यात आले.
संमेलनाच्या यशस्वी संयोजनासाठी ॲड. जयप्रकाश गायकवाड, एन. डी. गवळे, श्रावण नरवाडे, नागोराव डोंगरे, गंगाधर ढवळे, सदानंद सपकाळे, संजय जाधव, रमेश कसबे, एम. डी. जोंधळे, विजय सोंडारे, किशन ढवळे, एन. एम. झडते, डी. एम. खिल्लारे, सी. एस. ढगे, प्रभू ढवळे, विनोद हटकर, आर. पी. झगडे, एन. टी. पंडित, शोभा कोकरे, जयश्री डोंगरे, प्रमोद सूर्यवंशी, मिलींद नरवाडे, एम. एस. गव्हाणे, राहुल गवारे आदींनी परिश्रम घेतले.