मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल पायल रोहतगी यांना अटक करा असे नवाब यांनी म्हटले आहे. पायल रोहतगी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायल रोहतगी हिच्यावर कारवाई करणार नसतील तर याविरोधात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन राष्ट्रवादी उभारेल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. पायल रोहतगी हिला महाराजांचा अपमान करण्यासाठी सोडली आहे का ? राज्यात वातावरण चिघळण्याची वाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत का? असा सवाल करतानाच जर मुख्यमंत्र्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर राज्यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
काय म्हणाल्या पायल रोहतगी ?
“शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म क्षुद्र जातीत झाला होता”, असे वादग्रस्त ट्विट पायल रोहतगी यांनी केलं होते. त्यावरून लोकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.