नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपा – बसपा चा चांगलाच पराभव झाला. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागांपैकी बहुजन समाज पक्षाला अवघ्या १० जागा तर समाजवादी पक्षाला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता सपा -बसपा यांच्यातील महाआघाडी आता तुटण्याची शक्यता आहे.
आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत मायावती यांनी महाआघाडीची उत्तर प्रदेशात काही फायदा झाला नाही. यादवांचे मतदान बसपाला मिळाले नाही, असे सांगत उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली.
यंदाची लोकसभा निवडणूक समोर ठेऊन सपा, बसपा आणि आरएलडी यांच्या महाआघाडी झाली होती. तिन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशात ५० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता मात्र त्यांना एकूण फक्त १५ जागावर समाधान मानावे लागले होते. महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीचा जागा काँग्रेससाठी सोडली होती. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा हे तुल्यबळ पक्ष एकत्र येऊनही त्यांना भाजपला टक्कर देणे शक्य झाले नाही, हेच लोकसभा निवडणुकीतील निकालावरून दिसून आले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील महाआघाडीच्या कामगिरीवरून मायावती नाराज आहेत. त्यासाठी येणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.