नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना ताण दूर करण्याचा ‘गुरुमंत्र’ दिला. तसेच ‘चांद्रयान २’ चे उदाहरण देत त्यांनी विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांचे हताश चेहरे पाहून मी रात्रभर झोपू शकलो नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच राजस्थानच्या स्वामी विवेकानंद गव्हर्नमेंट मॉडल स्कुलमधील दहावीची विद्यार्थिनी यशश्री हिने बोर्डाच्या परीक्षेबाबत ऐकलं तरी मूड कंझाराब होतो, त्यासाठी काय सांगाल ? असा प्रश्न मोदींना विचारला. तेव्हा युवा वर्गाचा मूड ऑफ व्हायलाच नको असं मला वाटत, असे उत्तर मोदींनी दिले.
मोदींनी चांद्रयान २ चे गुपित सांगत ‘काही जणांनी मला तिथे जाण्यास मनाई केली होती. तुम्ही गेलात आणि मोहीम अपयशी झाली तर काय करणार? त्यावर मग मला जायलाच हवे असे उत्तर त्यांनी दिले. अगदी शेवटच्या क्षणी वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काहीतरी अघटित घडत आहे असे मलाही वाटू लागले. काही वेळाने याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, असे मी त्यांना सांगितले. दहा मिनिटांनी संपर्कच होत नाही, असे मला सांगण्यात आले,’ असे त्यांनी सांगितले. तसेच मी काही वैज्ञानिकांशी चर्चा केली. रात्री तीन वाजता हॉटेलवर गेलो. तिथे मी स्वस्थ बसू शकलो नाही. झोपही लागत नव्हती. पंतप्रधान कार्यालयातील इतर जण आपापल्या खोल्यांमध्ये गेले. अर्धा – पाऊण तास असाच गेला. मी फेऱ्या मारत राहिलो, असेही मोदींनी सांगितले.
तसेच मोदींनी विद्यार्थ्यांना सल्ला देत अपयशातून आपल्याला बरच काही शिकायला मिळते, असे सांगितले. तसेच प्रत्येक वेळी तितक्याच उत्साहाने प्रयत्न करतो. एखाद्या वेळी अपयशी ठरलात तर समजा तुम्ही यशाकडे वाटचाल सुरु केली आहे. एकदा का थांबला तर त्यानंतर काहीही केलं तरी त्यातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही, असेही मोदी म्हणाले.