मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सचिन वाझेंना सांगितले होते तसे पूर्वे आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हंटल आहे. सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं म्हंटल आहे. यावरून शरद पवारांवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर या विषयात काँग्रेसनं ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा निरुपम यांच्याकडून समाचार
पाच सहा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत केरळमधील काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी पवारांनी देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचे भाष्य केलं होत. सीपीआय एमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली असून अन्य काही नेत्यांबरोबरही यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितलं होतं. त्यावरून तिसरी आघाडी हेच करणार आहे का, असा सवाल करत आता निरुपम यांनी थेट पवारांना लक्ष्य केलं आहे.
वाझे प्रकरण म्हणजे सरकार पुरस्कृत वसुली कांड
सचिन वाझे प्रकरणावरून संजय निरुपम यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ट्विटरवरून गृहमंत्र्यांनी केलेल्या या प्रकरणात आयुक्तांची चूक होती या विरोधाभासी विधानामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलीन होईल. आतापर्यंतच्या तपासातून हे सरकार पुरस्कृत हफ्ता वसुली कांड असल्याचं दिसून येतं. शिवसेनेपर्यंत याचे धागेदोरे जातात का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.