मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये मुंबईतून वसूल करण्यास सांगितले होते, असा थेट आरोप आयपीएस अधिकारी असलेले परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नाही
एका आयपीएस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. पण, अनिल देशमुख हे चांगले काम करत असून राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले.
राज्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर मा. @CMOMaharashtra, मा. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने त्याची प्रतिक्रिया आली असेल.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 20, 2021
विरोधकांची मागणी हस्यास्पद
जयंत पाटील म्हणाले, दिल्लीमध्ये शरद पवार यांनी बोलावलेली बैठक ही नियोजित आहे. राज्यात काहीही झालं की विरोधक सरकार बरखास्त करण्याची मागणी करत असतात. आता ते हस्यास्पद वाटू लागले आहे. अनिल देशमुख हे चांगले काम करत आहे. त्यांच्या राजीनाम्याबद्दल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. योग्य तो तपास सुरु असल्याचे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई होणार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी कोणी ठेवली, त्यात जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं हे राज्याच्या जनतेसमोर आणणे सध्या महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे. तसेच राज्यातील सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका महाविकास आघडी सरकारने घेतली आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
कोणाला तरी खूश करण्यासाठी ते पत्र
तसेच कुणाला तरी खूश करण्यासाठी ते पत्र आहे. यामध्ये मी कोणाचेही नाव घेणार नाही. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक जण या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यानंतर जी महिती बाहेर येत आहे ती प्रसारमाध्यमातून दिसत आहे. यावरुन पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कितीही मोठा अधिकारी असला तरी हे खपवून घेतले जाणार नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याचा पाठपुरावा करत असताना हे पत्र समोर आले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
आज संध्याकाळी दिल्लीत बैठक
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांची दिल्लीत आज संध्याकाळी सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच गृहमंत्री बदलण्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजतेय. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.